आज वैशाख बुद्ध पौर्णिमा.जगाला शांततेचा, अहिंसेचा व समतेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांची जयंती.वैशाख पौर्णिमेलाच बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्या.जगातील कोणत्याच महापुरुषाचा बाबत अशा घटना घडल्या नाहीत.शाक्यमुनी तथागत बुद्ध जगाला प्रकाश देणारे तेजस्वी सूर्यच...
'बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे.‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त करून स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी! आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वत: सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष,उद्धार करू शकणारा महाज्ञानी! बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात.
मानव निर्मित दुःखाच्या मुक्तीकरिता सर्व सामान्यांना उमजेल असा साधा सोपा निसर्ग नियमांवर आधारित मार्ग तथागतांनी शोधून काढला.ज्याचे पालन करून आपण जीवनात सुख,शांती आणि आनंद प्राप्त करू शकतो.
न हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचनं |
अवेरेन हि सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो |
माणसाने माणसाशीच वैर करावे हे पाहून बुद्धांना मनस्वी दुःख होत असे. वैर टाकून सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने, सौजन्याने, सहानुभूतीने वागण्याचा त्यांनी संदेश दिला. तथागताची ती थोर शिकवण त्यावेळीही लोकांना पटली होती व ती आजही प्रेरक ठरत आहे.आज तथागत बुध्दांचे धम्मचक्र अवघ्या विश्वावर फिरत आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें